कृष्णाख्यान - भारतीय मनावर श्रीकृष्ण या नावाची मोहिनी गेली किमान पाच सहस्रके कायम आहे. प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असला तरी या सर्वांचे भारावलेपण हा त्यातील सामायिक दुवा आहे. त्याच्या कार्याचा आवाका, त्याची निर्णयक्षमता इतकी विलक्षण आहे की, आपण चकित झाल्याशिवाय रहात नाही. आज पाच हजार वर्षांनंतर जर आपली ही परिस्थिती असेल तर ज्या काळात तो जगला तो व त्याच्यानंतर लगतचा काळ यात तो दंतकथा बनून राहिला नसता तरच नवल.
त्याच्या कार्यकर्तृत्वावर चमत्कारांची आवरणे चढत गेली. वास्तविक पाहता त्याच्या कार्याला यातील कोणत्याही आवरणाची आवश्यकता नाही असे त्याचे कर्तृत्व निर्विवाद होते. भौतिक नियमांच्या चौकटीतच राहून त्याने त्याची अचाट कार्ये केली अन् त्याच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो भक्तगणांनी त्याला ‘भगवंत बनविण्यासाठी’ ही भौतिक नियमांची आणि तर्कवादाची चौकट मोडून टाकली!
कृष्णाख्यान कशासाठी ?
- मानवी पातळीवर महाभारत कसे घडले असेल हे कृष्ण-चरित्राद्वारे समजावून घेण्यासाठी.
- चमत्कार विरहीत कृष्ण समजून घेण्यासाठी, कृष्ण चरित्रातील चमत्कारांची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी.
- कृष्ण किती वर्षे जगाला? त्याच्या आयुष्यातील कोणत्या घटना त्याच्या वयाच्या कोणत्या वर्षी घडल्या? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी.
- कृष्णाचे संपूर्ण चरित्र समजून घेण्यासाठी.
कृष्णाचे खरेखुरे स्वरूप जाणून घ्यायची माझ्यासारखी जिज्ञासा असणाऱ्या वाचकांना माझे हे ‘कृष्णाख्यान’ नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.
https://maheshnaik.com